ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना पत्रकार महर्षी प्र. के. अत्रे पुरस्कार
पिंपरी –
सुदृढ, समृद्ध व तीक्ष्ण पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काळेवाडी येथे पुरस्कार सोहळ्यात केले. मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना “पत्रकार महर्षी प्र. के अत्रे पुरस्कार 2022” देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्ही.एस.आर.एस न्युज मीडिया ग्रुपचे मुख्य संपादक डॉ. लालबाबू गुप्ता, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, शहराध्यक्ष दादाराव आढाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गिरीश प्रभुणे म्हणाले पुढे म्हणाले की, सध्याच्या आधुनिक युगामध्ये पत्रकारितेची बिकट वाट सुरू आहे. पत्रकारांनी स्वतःचा तोल स्वतःच सावरावा लागतो, कोणीही मदतीला येत नाही. मी स्वतः पत्रकारिता केली असून आठ पानाचे साप्ताहिक वर्तमानपत्र प्रकाशित करत होतो. मी सडेतोड लेख लिहिल्यामुळे माझ्या घरावरही हल्लेखोरांनी हल्ले केले आहेत. पत्रकारांनी सत्यतेची कास सोडू नये.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. लालबापू गुप्ता आपल्या भाषण म्हणाले की “राजकारण, समाजकारण व प्रशासनामध्ये न्याय मिळत नसेल तर शेवटी पत्रकारांकडे धाव घेतात. हा जो पत्रकारांप्रती विश्वास आहे तो विश्वास पत्रकारांनी कायम ठेवला पाहिजे.
कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती विजय भोसले सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड शहर संघटना ही जरी नवीन असली तरी संघटनेत काम करणारे पदाधिकारी जुनेच आहेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे हे पत्रकारांसाठी गेली अनेक वर्षे काम करत आहेत. बापूसाहेब गोरे यांनी कोरोनाच्या भीषण काळात पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या घरोघरी जाऊन अन्नधान्य कीट वाटप केले हा त्यांचा उपक्रम महाराष्ट्रात कौतुकास्पद ठरला आहे.
यावेळी माजी नगरसेवक कैलास थोपटे, युवक काँग्रेसचे शहरध्यक्ष नरेंद्र बनसोडे, आरपीआयचे अजीज शेख, काँग्रेसचे अशोक मोरे, बी.आर.माडगूळकर उपस्थित होते. या वेळी अध्यक्ष – दादाराव आढाव,वरिष्ठ उपाध्यक्ष – संतलाल यादव, उपाध्यक्ष – महेश मंगवडे, संजय बोरा,सरचिटणीस – सुनील कांबळे, चिटणीस – श्रध्दा कोतावडेकर/कामथे, कोषाध्यक्ष- जितेंद्र गवळी, कार्यकारणी सदस्य – सायली कुलकर्णी, विनोद लोंढे, संतोष जराड, विश्वास शिंदे, सदानंद रानडे, कलिंदर शेख, अमोल डांबळे, मनीषा प्रधान, श्रद्धा प्रभुणे, प्रितम शहा, गणेश शिंदे, मुकुंद कदम, अतुल वैराट, मोहन दुबे, सुहास आढाव या नूतन कार्यकारणीचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे, नरेश नातू, यशवंत नामदे, विकास चौधरी इत्यादी उपस्थित होते
कार्यक्रमाची प्रस्तावना बापूसाहेब गोरे यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिध्द निवेदक अक्षय मोरे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष दादाराव आढाव यांनी मानले.
राज्यात नवीन २३ संवर्धन राखीव, ५ अभयारण्यांची निर्मिती
मुंबई –
राज्यात मागील अडीच वर्षात १७५०.६३ चौ.कि.मी चे २३ नवीन संवर्धन राखीव, ६४७.१२९४ चौ.कि.मी ची ५ नवीन अभयारण्ये आणि ८५.८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित असून, या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्ग ही सुरक्षित होतांना दिसत आहे. शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिले असून शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या २३ संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी ९ संवर्धन राखीव क्षेत्रं अधिसूचित झाले असून उर्वरित संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसुचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.
राज्यातील ‘ही’ आहेत संवर्धन राखीव क्षेत्रं (कंसातील आकडे चौ.कि.मी) :
शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव (२६९.४० चौ.कि.मी), विस्तारीत अंधारी वन्यजीव अभयारण्य ( ७८.४०), जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी (१२२.७४०), गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का ( १७५.७२), बुलडाणा जिल्ह्यातील विस्तारीत लोणार वन्यजीव अभयारण्य ( .८६९४) अशी पाच अभयारण्ये याच कालावधीत घोषित केली आहेत. यातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसुचना निघाली असून उर्वरित अभयारण्याची अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.
पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड (३३.०१), धुळे जिल्ह्यातील लांडोरखोरी (४८.०८), कोल्हापूर जिल्ह्यातील बांबर्डे मायरेस्टिका (२.५९) आणि शिुस्टुरा हिरण्यकेशी ही चार जैवविविधता वारसा स्थळे मागील अडीच वर्षाच्या काळात घोषित करण्यात आली असून या सर्वांची अधिसुचना निर्गमित झाली आहे.
लोणारला रामसर साईट दर्जा मिळाला असून ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या रामसर दर्जाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
मुंबई –
राज्यात कोकणात मान्सूनला सुरूवात झाली असली तरी तो राज्यातील इतर भागात पोहोचण्यासाठी विलंब लागत आहे. दरम्यान, कालपासून नंदूरबार, जळगाव, परभणी या परिसरात मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली आहे. मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याचे आयएमडीकडून सांगण्यात आले आहे. परंतु कोकणानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात मान्सूनला सुरूवात होते. यंदा मात्र मान्सूनचा पाऊस या भागात झाला नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकरी खरिपाची पेरणी करण्यासाठी थांबला आहे. तर हवामान खात्याच्या माहितीनुसार 75 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
10 जूनला कोकणात पोहोचलेला मॉन्सून 11 जून रोजी बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात डेरेदाखल झाला. तर सोमवारी मॉन्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठला.
निम्म्या महाराष्ट्रासह दक्षिण गुजरात, कर्नाटकचा बहुतांश भाग तेलंगाणा, रायलसीमाचा काही भाग आणि तमिळनाडूच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने चाल केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. शुक्रवारपर्यंत (ता. 17) गुजरातच्या आणखी काही भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक तामिळनाडूसह विदर्भाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या आणखी काही भागासह झारखंड, ओडिशा, बिहार काही भागातही मॉन्सून प्रगती करण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.
नवी दिल्ली –
जगातील सर्वात मोठ्या विषारी सापाला किंग कोब्रा म्हणतात. किंग कोब्राची लांबी सुमारे 13 फूट असू शकते, ज्याची ओळख मोठा फणा आहे. किंग कोब्राचे साम्राज्य भारतापासून इंडोनेशियापर्यंत विस्तारले आहे. यापैकी चार प्रजाती संपूर्ण जगावर राज्य करतात, जे किंग कोब्राच्या प्रजातींचे राजेशाही वंशज आहेत. या एकमेव सापाची चार वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. संकरित प्रजननानंतर, किंग कोब्राचे स्वरूप वेगळे, भयावह आणि विषारी असते.
जगात आढळणाऱ्या किंग कोब्राच्या चार प्रजातींना अद्याप अधिकृत नाव मिळालेले नाही. परंतु ते नैऋत्य भारतातील पश्चिम घाट वंश, भारत आणि मलेशियातील इंडो-मल्यायन वंश, पश्चिम चीन आणि इंडोनेशियातील इंडो-चायनीज वंश आणि फिलीपिन्समध्ये आढळणारे लुझोन बेट वंश या नावांनी ओळखले जातात. चला जाणून घेऊया किंग कोब्राबद्दलचे धक्कादायक खुलासे…
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे उत्क्रांतीवादी पर्यावरणशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे संशोधक कार्तिक शंकर म्हणतात की किंग कोब्राच्या अनेक प्रजाती आहेत हे आश्चर्यकारक आहे. कारण त्या सर्व सारख्याच दिसतात. ते परिसरानुसार वागतात, असे अभ्यासात म्हटले आहे.
समानता असूनही, ते मोठ्या भौगोलिक क्षेत्रात राहतात. उदाहरणार्थ, फिलीपिन्समध्ये आढळणाऱ्या कोब्राच्या शरीरावर पांढर्या रंगाचे वर्तुळ असतात, तर थायलंडमध्ये आढळणाऱ्या कोब्राचे शरीर सफेद रंगाचे असते.
कोब्रा हा एक असा साप आहे जो आजूबाजूच्या वस्तू गोळा करतो आणि आपले घरटे बनवतो ज्यामध्ये तो अंडी घालतो. त्यांची अंड्यांबद्दलची वागणूक देशानुसार बदलते. अनेक भागात, मादी किंग कोब्रा अंडी उबवतात तर काही ठिकाणी ते तसेच सोडतात.
संशोधक किंग कोब्राचे वर्तन आणि शारीरिक फरक तसेच चार प्रजातींमधील अनुवांशिक फरक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्नाटकातील कलिंगा सेंटर फॉर रेन फॉरेस्ट इकोलॉजीचे जीवशास्त्रज्ञ पी. गौरीशंकर म्हणतात, किंग कोब्राच्या आनुवंशिकतेचा अभ्यास करणे कठीण काम आहे. त्यांना धरून त्यावर संशोधन करणे धोकादायक ठरू शकते.
किंग कोब्राचा अभ्यास करण्यात अडचणी येत असल्याचे ते सांगतात. त्यांनी सांगितले की किंग कोब्रामधील अनुवांशिक फरक समजून घेण्यासाठी त्यांच्या टीमने 62 किंग कोब्राचे डीएनए नमुने गोळा केले आहे.
संशोधकांनी प्रथम मायटोकाँड्रियल जनुकांचा अभ्यास केला. ही जनुके आईकडून मुलाकडे हस्तांतरित केल्यामुळे हे केले गेले आहे. यामध्ये चार वेगवेगळ्या प्रजातींची माहिती मिळाली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते कोणत्याही एका स्थानिक प्रजातीशी संबंधित नाहीत आणि त्यांच्याशी संबंधित नाहीत. अनुवांशिकदृष्ट्या देखील ते भिन्न आढळले आहेत.